गुरुवार, ३१ मे, २०१२

एकटेपण

जेव्हा
आपलं असं कुणीही नसतं,
तेव्हा सोसता येतो एकटेपणा
एक अनिवार्य सत्य म्हणून !

आणि
साहता येतो
मनाच्या उदार भिंतींचा कोसळता आक्रोश
मनाच्याच सांदीकोपऱ्यात पिशाच्याप्रमाणे,
निर्विकार..

इथे
मनाच्या स्मशानात
स्तब्ध शांत काळोखात पेटत जाताहेत
आत्मघाती चिता -
अंधाराला डागण्या देत प्रसवताहेत
दु:खाची चिवट पिलावळ...

आताशा
तुझ्यामाझ्या मिसळत्या श्वासांतूनही
प्रकटत नाही अद्वैत !
होत नाही आताशा
तुझ्या ओठांच्या आणि डोळ्यांच्या सीमारेषेवरील सत्य , एक !

पापण्यांतील खाऱ्या पाण्यात
उरलीय नुसती धग;
नाही सोसवत आता
तुझ्या मिठीतले माझे एकटेपण ...!
_डॉ.सुनील अहिरराव