गुरुवार, २१ मार्च, २०१३

बुर्खा

रेक माणूस नागमोडी
कुणीच नाही सुतासारखा
सुरी तयाच्या बगलेमध्ये
जरी दिसे हा दुतासारखा !

बुर्ख्यामध्ये दंतकथेच्या
हरेक किस्सा मृतासारखा
गळ्यास येता : विचारवंत
बनून जातो बुतासारखा !

मृदेत किल्ला कशास् बांधा
विरून जातो मुतासारखा
फिरून व्योमी तिथेच येतो
जन्म असा हा भुतासारखा !
- (C) डॉ.सुनील अहिरराव

मंगळवार, १९ फेब्रुवारी, २०१३

शब्द

पूर्वी
शब्द ओथंबलेले , तप्त , अनावर , अलवार :
अलगद तुझ्या गालावरून अश्रूंसारखे ओघळणारे  ..
ते हलकेच टिपून घेताना त्या हव्याहव्याशा वाटणाऱ्या धगीतून घट्ट दाटून यायचे आवेग,
आणि जीव चिंब ओला व्हायचा !
असे असंख्य क्षण तुझ्या माझ्या शब्दांनी आसमंतावर कोरून ठेवलेले :
आजही कुठे कुठे त्यांच्या अवशेषांच्या खुणा विखुरलेल्या...!
अवशेष !   किती भयाण शब्द वाटतो !
पण
मनाचा एकेक दगड निखळून गेल्यावर,
वादळांत हरवलेल्या एकाकी  वाटांवर
कुठवर तग धरणार कुणाच्याही सोबतीविना ?
आताशा
दाटून आलेले आभाळ पूर्वीसारखे गदगदून सांडत नाही; आता ती हवीहवीशी धग  नाही,
आता शब्द म्हणजे  म्हणजे जलाबाहेर काढलेल्या मत्स्याची  तडफड फक्त ! 
तसेही रोज कितीदा मरावे आणि रडावे आपण स्वत:च्याच कलेवरावर,  उर फुटेस्तोवर !
कितींदा सांडावे स्वत:लाच इथे -तिथे -
आणि मग वेचत फिरावा  रानोमाळ स्वत:च्याच अस्तित्वाचा एकेक तुकडा : हा माझा की तो ?

- डॉ. सुनील अहिरराव

सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२

सिद्धांत

क्षणोक्षणी कणकण जगण्याची धडपड
तुझीही -माझीही ..
ढासळते आहे माती , निखळतो आहे एकेक दगड..
हलक्याशा आघातानंही कोसळत आहेत आतल्याआत
मनाच्या ठिसूळ झालेल्या असंख्य भिंती..
पत्त्यांचे बंगले हलक्याशा झुळुकेने कोसळावेत,
तितक्या सहजपणे विखुरून जातोय कणनकण..
त्याच त्या अवशेषांवर कितींदा उभारायचं स्वतःचं अस्तित्व ?
आशांचे अंधुक कवडसे मावळून गेलेले
स्वप्नांचे फिनिक्स फार मागेच राखेत कायमचे दफन झालेले,
तरीही ही कोणती धुगधुगी घेऊन जगतो आहोत ,
समजत नाही.
डार्विनचा सिद्धांत कितींदा सिद्ध करतो आपण
जगण्याच्या धडपडीतून आणि ती शमतानाही ... !
- डॉ. सुनील अहिरराव 

मंगळवार, ११ सप्टेंबर, २०१२

मुक्ती

जन्मासोबत मी घेऊन येतो
आयुष्याशी जन्मजन्मांतरीचे वैर आणि
आत्मघातांचे मयुरपंखी शाप.



तुझ्या कांकणांचे हळवे संगीत विरून गेल्यावर

क्षणाक्षणाला भोगतो मी माझे मरण.

मी पहुडतो स्मशानस्थ शांततेत

स्थितप्रज्ञासारखा माझ्याच सरणावर



आणि

आयुष्याच्या कणाक्षणाचा
सारा अंगार ओतून मीच मला जाळत राहतो
निमुटपणे मुक्तीची वाट पहात..

नंतर
तुझ्या आसवांची उष्ण गाथा
आणि तुझ्या थरथरत्या ओठांतील दु:खाचा अस्फुट उद्गार ,
शांततेच्या कणाकणाला छेदत जातो.

मी माझ्या ओठांनी हलकेच टिपून घेतो तुझी आसवे!
तुला ते कळतं की नाही, माहित नाही;
पण त्या सरत्या क्षणी मी पाहिलेले असतात
तुझ्या डोळ्यात माझ्या स्वप्नांचे मुक्त पक्षी !


डॉ.सुनील अहिरराव

मंगळवार, १४ ऑगस्ट, २०१२

क्षण कोसळते...

कोण कुठल्या क्षणांचे क्षणाक्षणाला बदलणारे अनंत संदर्भ मेंदूत भरून जगत असतो आपण ! कुठून कसा ,कुठला क्षण कालौघातून ओघळेल आणि कोसळेल आपल्यावर, सांगता येत नाही. त्या क्षणाच्या कोसळण्यावर आपल्या अस्तित्वाचा डोलारा उभा असतो. तो कोसळेपर्यंत वाट पाहणे इतकेच आपल्या  हाती... इथेच आशा नव्याने जन्म घेत जाते. त्या येणाऱ्या क्षणात कदाचित असणार असतो आपले कोसळते अस्तित्व सांभाळणारा एक दीपस्तंभ ! मात्र एक निश्चित की त्या त्या क्षणांना आपण रोखू शकत नाही. .पुन्हा नव्या संदर्भांचे ओझे घेऊन एक प्रवास सुरु राहतो ... त्या त्या क्षणांच्या कोसळण्याची वाट पाहणे इतकेच आपल्या हाती ! त्याने जे दान तुम्हाला दिले ,ते निमुटपणे स्वीकारण्याशिवाय पर्याय तरी कोणता ?

सुखाला जसे विविध रंग असतात, तसेच दु:खाच्याही अनंत छटा... ! प्रत्येकाचं दु:ख मोठं  आणि परद:ख शीतलं ..आपल्या दु:खाला श्रोता मिळू शकतो पण आपल्या स्वतःशिवाय दुसरा सोबती मिळत नाही. ती तीव्रता आपली आपण भोगायची : कधी सुन्न,बधीर व्हायचं; कधी हुंदके देऊन रडायचं, कधी निगरगट्टपणे कोरडेपणाने आपल्याच दु:खावर भीषण हसायचं ! आपल्या इवल्या डोळ्यांइतकच आपलं आकाश...त्यात जमतील तशा वेड्यावाकड्या रेषा आखायच्या.  काही आकृत्या ,चित्रे रेखाटायची..ती सुद्धा अंगावर धावून येणारी..त्याच एब्स्ट्राक्ट आकारांत हरवून जायचं आणि त्याच त्या रेषांच्या रिंगणात फिरत रहायचं दरक्षणी कोसळत्या नव्या क्षणाच्या प्रतीक्षेत ! सगळंच म्हटलं तर आखीवरेखीव म्हटलं तर सगळंच विस्कळीत ...

असे असंख्य गुंते आणि त्यांची वेडीवाकडी भेंडोळी जमा करत चाललो आहोत आपण. कधी सुटलेच गुंते तर - वरवरचे वाटतात सुटल्यासारखे ; बहुधा हे सुद्धा तितकेसे खरे नाहीच ! एक धागा उकलताना नकळत त्याचा एक नवा गुंता ,एक नवे भेंडोळे तयार होते. आयुष्य म्हणजे साऱ्या क्षणांच्या संदर्भाचं एक मोठं भेंडोळं आणि आपण त्यात अडकलेले क्षुद्र जीव. अचानक हे धागे कधी स्वतःच उकलले जातातही ... क्षणांचे, वर्षांचे संदर्भ उलटून गेल्यावर नामोनिशाणही उरत नाही. ही उकल होण्यासाठी पुन्हा त्या क्षणाच्या कोसळण्याची वाट पाहणे ; मात्र ती तशी होणे न होणे त्या त्या क्षणावर अवलंबून... ! त्या क्षणाच्या बरसल्यानंतरचा प्रतिक्रियेचा क्षण तरी आपला असतो का, प्रश्नच आहे कारण एखादा  क्षण कोसळताना मिटवून जातो  आपलं असणं, तेव्हा पुढचा क्षण वाट्याला येत नाहीच...मग एक अनंत प्रवास अपरिहार्यपणे...

- डॉ. सुनील अहिरराव





सोमवार, १६ जुलै, २०१२

अंधार

अंधार..

सभोवती नितळ ,निखळ, काळाभोर अंधार ..
खिडक्यांचे आकाशी नेत्रही झाकलेले.
मी पीत राहतो
तिमिराचे बर्फाळ गहिरेपण आणि
साठवत राहतो माझ्या मनातील तारे निखळल्यानंतरचे रितेपण !



शांतता भिनत जाते

अंधाराच्या कणाक्षणात अंगभर, काही क्षण..


 मग काळजात लख्खकन् चमकून जातं धारदार पातं-


 तुझ्या चेहऱ्यावरील अंधारवस्त्र सारून 



मी न्याहाळतो
तुझे संगमरवरी वासनांतीत नग्न सौंदर्य..

तू ओथंबत्या नजरेने सामावून घेतेस मला माझ्या तिमीरछटांसह ,
 अलगद ; फुलपाखराला कवटाळावे तसे.
 विवस्त्र शांततेत तुझ्या कांकणांचे संगीत,
ओठांची थरथर 
 आणि श्वासांतील बेधुंद आवेग-
 तुझ्या रक्तात पाझरतात माझे रंग, गंध, श्वास आणि रक्तही..
 आपण वाहत राहतो एकमेकांत आपले स्वत्व
 आणि शोधत राहतो
 अद्वैत !

तुझ्या नकळत माझी स्वप्ने तुझी होतात
 अन् माझ्या डोळ्यात सप्तरंगी आभास येतात.
 सभोवती नितळ ,निखळ काळाभोर अंधार..

डॉ.सुनील अहिरराव

गुरुवार, २८ जून, २०१२

इष्टापदा

पोळलेल्या माणसांचे काय सांगू,
पेटल्या मंत्रालयाचे काय सांगू

वाद नाही, काय ते आक्रीत होते !
आपदा इष्टापदांचे काय सांगू

धड धडा ह्या फायली साऱ्या जळाल्या
गूढ होते काय त्याचे , काय सांगू

 सोडला नि:श्वास त्यांनी दाटलेला
 दैव  होते थोर त्यांचे , काय सांगू

वाचले ते नेमके होते पुढारी,
जीव गेले माणसांचे  ! काय सांगू

संविधाना,  झोप की हे सोंग यांचे 
मानभावी  लांडग्यांचे , काय सांगू
    _डॉ. सुनील अहिरराव